Meenal

Meenal Patil

सौ. मीनल मंगेश पाटील ह्यांचे मूळ गाव घिवली. त्या पूर्वाश्रमीच्या कु. शालीनी वामन पाटील, पंचाळी येथील श्री वामन रामजी पाटील यांच्या कन्या. लग्नानंतर पती श्री. मंगेश गणपत पाटील यांचे बरोबर नोकरीनिमित्त पालघर येथे रहावयास आल्या, आणि कायमस्वरूपी पालघरवासीय झाल्या. सुरुवातीच्या खडतर काळात पतीच्या मागे खंबीरपणे उभे रहात, भारतीय पोस्ट खात्यात 32 वर्षे नोकरी करून, त्यांनी संसाराला मोलाचा हातभार लावला. दोनही मुलींना उच्चशिक्षित करून त्यांचे संसार मार्गी लावले. दोन विवाहीत मुली, जावई तसेच नातवंड असा त्यांचा समाधानी परीवार आहे. निवृत्तीनंतर त्यांनी त्यांचे छंद , अवांतर वाचन,लेखन आणि गायन हे छंद त्यांनी जोपासले आहेत. त्यांना सामाजीक कार्याची आवड आहे. निरनिराळे पौष्टीक खाद्य पदार्थ बनविण्यात त्यांना विषेश आनंद मिळतो. भ्रमंती करून अनेक अनुभव गाठीशी बांधण्यात त्या सदैव उत्सुक असतात. त्यांना गायनाची आवड असल्यामुळे घरगुती मैफलीत मराठी चित्रपट संगितातील बहुतेक नावाजलेल्या गाण्यांचा आस्वाद त्यांच्या निकटवर्तीयांना नेहमीच घेता येतो. गाण्यांचा आस्वाद जरी आपणा सर्वांना नाही घेता आला, तरी त्यांच्या लेखणीचा आस्वाद आपणास या इथे नक्कीच घेता येईल.

चौकळशी वाडवळ समाजातील लग्नविधी - भाग दुसरा

960

 

आजच्या तरुणी आपल्या नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या गावापासून लांब म्हणजे शहरी भागात राहात असल्याने त्या तरुणींना आपल्या वाडवळी लग्नाच्या रीती कशा कराव्यात याबद्दल कल्पना नसते.

उदा. -    १) नवरा किंवा नवरीच्या अंगाला हळद लावताना ती कशी लावावी?

२) तेलवणाची रीत कशी करावी?

३) पोखण कसे करावे?

४) पोखण केल्यावर आरती कशी करावी?

५) उखळीत घाणा कसा कुटावा? इत्यादी.

 म्हणून या सारख्या लग्न रीतींच्या क्रुती विषयी नवविवाहित तरुणींना थोडी माहिती देण्याचा हा छोटासा प्रयत्न करीत आहे.

 

१) हळद लावणे  :

 

लग्नाच्या आदल्या दिवशी आख्खी हळकुंडं फोडून भिजविणे व ती वाटून बारीक करणे. अशी वाटलेली हळद आपल्या दोन्ही हातात घेऊन ती हळद नवरा/नवरीच्या प्रथम पायापासून सुरुवात करून पाठीला, पोटाला, हाताला, कपाळाला आणि चेहऱ्याला लावणे. एकूण सात किंवा नऊ वेळा हळद लावतात. पहिल्या सहा किंवा आठ वेळा चढत्या क्रमाने लावणे म्हणजे पायापासून कपाळापर्यत व शेवटची हळद उतरत्या क्रमाने लावणे म्हणजे प्रथम कपाळाला, चेहऱ्याला, हाताला, पाठीला, पोटाला व शेवटी पायाला अशी लावणे. (कोहळ्याच्या वेळेस लावलेली हळद ही सात किंवा नऊ हळदी मध्ये मोजली जात नाही)

 

२) तेलवण पाडणे :

 

नवरा/नवरीच्या अंगाला हळद लावून झाल्यावर एका सुवासिनीने आंब्याच्या एका पानाचा द्रोण तयार करणे व त्यात थोडे तेल घेणे.हे पान चारही सुवासिंनीनी एकमेकांच्या हाताला हात लावून नवरा/नवरीच्या डोक्यावर पकडणे व तेलवणाचे गाणे संपेपर्यंत हाताने ते पान हळूहळू हालविणे आणि गाणे संपल्यावर हाताने चिरुन ते पान बाजूला फेकणे.

 

३) पोखण करणे किंवा पोखणे :

 

हळद लावून झाल्यावर व तेलवण पाडल्यावर त्या चार सुवासिनीं पैकी एका सुवासिनीने आपल्या दोन्ही हातात थोडे तांदूळ घेऊन आपले दोन्ही हात नवरा/नवरीच्या प्रथम पायाला, गुडघ्याला व खांद्याला अशा क्रमाने लावून आपल्या दोन्ही हातातील तांदूळ नवरा/नवरीच्या डोक्यावरुन बाजूला थोडे थोडे उडविणे व उरलेले तांदूळ एका ठिकाणी जमा करणे. नंतर बाकीच्या तीन सुवासिनीं नवरा/नवरीच्या डोक्यावर हात ठेवून उभ्या असतात तेथे जाऊन नवरा/नवरीच्या डोकीवर हात ठेवून उभे राहणे. नंतर हाच क्रम बाकीच्या तिघींनी करणे. यावेळी सर्व सुवासिनींनी "उतरणी तीळ तांदूळ--------" हे पोखणाचे गाणे म्हणणे.त्या गाण्यात रीत करणाऱ्या चारही सुवासिनींचं नांव क्रमाने घेऊन तिच्या नवऱ्याचं आणि भावाचही नांव घेणे.

 

४) आरती ओवाळणे  :

 

एका सुवासिनीने आरतीच्या ताटातील तांदूळ पूर्व दिशेला प्रथम टाकून पूर्व दिशेला आरती ओवाळणे. नंतर त्याच पध्दतीने पश्चिम दिशेला ओवाळणे. पुढे त्याच आरतीने नवरा/नवरीला ओवाळणे. आरती ओवाळून झाल्यानंतर नवरा/नवरीच्या मांड्यांवर, खांद्यावर व डोक्यावर आपल्या हाताने आरतीचा शेक देऊन कपाळाला टिळा लावणे व आरती संपविणे. कधी कधी या चार सुवासिंनी पैकी एका सुवासिनीने आपल्या हातात आरतीचे ताट पकडून बाकीच्या तिघींनी तिच्या हाताला हात पकडून एकत्र आरती केली तरी चालते.

 

५)उखळी घाणा कुटणे :

 

सजविलेल्या मोठ्या उखळीला आंब्याच्या पानासह झेंडूच्या फुलांचा हार बांधून घेणे. चार मुसळंही सजवून त्यांना फुल पान बांधणे. कोऱ्या सुपाच्या आतल्या भागात भिजविलेल्या कुंकवाने स्वस्तिक काढून त्यात आख्खा भात टाकणे आणि हळकुंड, सुपारी, झेंडूचेफूल, पैशाचे नाणे टाकून चार सुपे चार सुवासिनींच्या हातात देणे. चार मुसळंही देणे. सुवासिनींच्या मध्यभागी उखळी ठेवून झाल्यावर ब्राह्मणाच्या मंत्रोच्चारानंतर सुवासिनींनी आपल्या सुपातील हळकुंडं, सुपारी, पैसे व झेंडूचेफूल बाजूला काढून ठेवणे. घाणा कुटताना प्रथम एका सुवासिनीने आपल्या एका हातातील सुपातील थोडे भात एका हाताने उखळीत टाकणे व नंतर दुसऱ्या हाताने त्या भातावर मुसळाने उखळीत कांडणे तिने ही क्रिया केल्यानंतर तिच्या समोरच्या सुवासिनीने अशीच रीत करणे व दोघींनी ओआपल्या मुसळाची अदलाबदल करणे. उरलेल्या दोघींनीही अशीच रीत करणे व थोडे थोडे भात टाकून घाणा कुटणे यावेळी उखळी घाण्याचे गीत गाणे.

 

६) नवऱ्या मुलाची उष्टी हळद नवरी मुलीकडे घेऊन जाणे :

 

नवऱ्याच्या अंगाला हळद लावून झाल्यावर म्हणजे मेढीच्या मुहूर्ताची हळद लावून झाल्यावर नवऱ्याची उष्टी हळद नवरी कडे घेऊन जातात. कांही ठिकाणी घाणा मुहूर्त झाल्यावर हळद नवरीकडे नेतात.(सोईनुसार)ही उष्टी हळद एका सजविलेल्या बाँक्स मध्ये घेऊन जातात. जाताना दोन किंवा तीन जोडपी हळद घेऊन जातात.

या उष्ट्या हळदी सोबत नवरीसाठी

  • सालासकट एक नारळाचा जोड.
  • ओटीचं सामान
  • नवरीसाठी वेणी किंवा गजरा
  • झेंडूच्या फुलांची मुंडावळ
  • साग आणि उंबराची मेढ
  • हळदीची साडी

  या वस्तू घेऊन जातात. हळद घेऊन गेलेल्या सुवासिनी तेथे जाऊन नवरीच्या अंगाला हळद लावतात. नंतर तेलवण करून पोखण करतात व आरती ओवाळतात. तसेच हळद लावताना हळदीचे गाणे म्हणतात. पाहुणचारानंतर परत येतात.

 

७) माहीजोग :

 

माहीजोग म्हणजे मातीची मडकी. पूर्वी यात एकवीस मडकी आणली जात असत; परंतु हल्ली काही रितींना कळशाही वापरतात. म्हणून या माहीजोगात हल्ली मडकी कमी आणतात. हल्ली रितीसाठी लागणारी मडक्यांची संख्या खालीलप्रमाणे

  • पाटापूजनासाठी - मध्यम मडकं --१
  • मयारासाठी   - मोठं मडकं + छोटं मडकं = १+१+ १ कोडं
  • नवरा/नवरीच्या आंघोळीसाठी     -  ४
  • लग्नानंतर नवरा -नवरी भोवती फिरण्यासाठी   -  ४
  • गौरेतणीमधील कुमारिकेला देण्यासाठी    -- १ करवी (छोटे मडकं)
  • लग्नविधी साठी पाट्यावर ठेवण्यासाठी कुंडल्या   --  ४

 

 लग्न विधीमध्ये कोणत्या विधिसाठी कोणाला मान द्यावा  :

 

१)गणेश पूजन : नवरा किंवा नवरीच्या आईवडिलांना.

 

२)कोहळे कापणे : घरातील मोठ्या भावाला किंवा भाऊ नसल्यास कुटुंबातील दुसऱ्या जोडप्याला.

 

३)घाण्याचा मुहूर्त : भावाला किंवा भाऊ नसल्यास कुटुंबातील इतर जोडप्याला

 

४)मेढीचा मुहूर्त : घरातील एका जोडप्याला किंवा भाऊ नसल्यास कुटूंबातील इतर जोडप्याला.

 

५)हवन : नवरा किंवा नवरीचे आईवडील किंवा लग्न झालेली बहिण. हे दोघेही उपलब्ध नसल्यास मोठ्या भावाच्या जोडप्याला.

 

६)कांकण : नवरा/नवरीचे सख्खे मामा-मामी.अन्यथा मानलेले मामा-मामी.

 

७)मयारं : नवरा/नवरीची आत्या म्हणजे  वडिलांची बहिण.

 

८)करवली : नवऱ्या मुलाची सख्खी बहिण किंवा चुलत/मावस बहिण.

 

९)वरमाय : नवऱ्या मुलाची आई किंवा आईला शक्य नसल्यास काकी किंवा मोठी वहिनी.

 

१०)गौरेतणी : कोणत्याही  १२ सुवासिनी  अधिक एक कुमारिका अश्या एकूण  १३जणी.

 

११)लग्न सट्टी : मामा-मामी आणि मामाकडील इतर नातेवाईंकांचा मान.

 

-------------------

भाग तिसरा  👈🏻(click here)

 

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

0 + 6=    get new code
Post Comment